पिंपरी -औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन मागासवर्गीय तरुणाचे हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण आणि लाठ्या-काठ्यांनी ठेचून जीवे मारल्याची गंभीर घटना घडली. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये कायदा-सुव्यवस्था उरलेली दिसत नाही. महाराष्ट्रात आता जंगलराज सुरू झाले आहे का ? असा संतप्त सवाल लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मनोज शेषराव आव्हाड या औरंगाबाद येथील तरुणाला लायटिंग चोरल्याच्या संशयावरुन आठ जणांच्या टोळक्याने 20 एप्रिल रोजी त्याचे हातपाय बांधून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित करून तो तरुणाच्या नातेवाइकांना पाठविल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगाराने केलेले कृत्य आणि त्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना कायद्याची आणि पोलिस यंत्रणेची कोणतीही भिती राहिली नसल्याचे अधोरेखित होते. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे. तसेच, दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी. अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही गोरखे यांनी दिला आहे.