पुणे : पानशेत धरणफुटीला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निसर्ग संवर्धनाची हाक देण्याबरोबरच पुण्यावर किंवा देशात अशा प्रकारचा कुठेही प्रलय यायला नको यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे येथे वृद्धेश्वर घाट येथे जलपूजन करून प्रार्थना करण्यात आली.
पानशेत पूरग्रस्त वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक मधुकर गालिंदे, पंढरीनाथ खोपकर आणि पांडुरंग भोंडे यांच्या हस्ते आणि पानशेत पूरग्रस्तांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. या वेळी पानशेत पुराच्या आठवणी कथन करण्यात आल्या. या वेळी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महेश हांडे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
12 जुलै 1961 ही तारीख पुणेकर नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. 60 वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या जलप्रलयाने पुणे शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला असला, तरी ही रात्र हजारो कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली होती. आजही, या घटनेचे अनेक साक्षीदार पुण्यात आहेत. त्यांच्या तोंडून या काळरात्रीबद्दल ऐकल्यास आजही डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येतो. या प्रलयात अनेकांनी आपला थाटलेला संसार डोळ्यांदेखत पाण्यात वाहून जाताना पाहिले. अनेकांना कुटुंबीय गमवावे लागले. या सर्वांचे दु:ख शब्दांत मांडता न येणार नसल्याच्या भावना यावेळी उपस्थित पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या.