लखनौ – उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या राजवटीत अत्यंत भीषण स्थिती निर्माण झाली असून, प्रशासन पूर्ण ढासळले आहे. राज्यात अराजकता माजली आहे, अशी जाहीर टीका उत्तर प्रदेशातील सुमारे 200 प्रतिष्ठित व्यक्तींनी खुल्या पत्राद्वारे केली आहे. त्या दोनशे जणांमध्ये 74 जण माजी आयपीएस किंवा आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी या खुल्या पत्राद्वारे व्यक्त केलेल्या भावनांना महत्त्व दिले जात आहे.
सरकार विरोधकांची सर्रास धरपकड करून त्यांचा कोठडीत छळ केला जात आहे, लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमांवर हल्ले केले जात असून, गोहत्येच्या आरोपाखाली अनेकांना रासुका लावला जात आहे. राज्यातील ही स्थिती अराजकतासारखीच आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
योगी सरकारने अत्यंत बेफिकिरीने कोविड स्थिती हाताळल्याची टीकाही यात करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, कोविडच्या साथीत असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा मृतांची मोजदादच केली गेलेली नाही असा ठपकाही या पत्रात ठेवण्यात आला आहे.
या राज्यातील प्रशासन रोज कायदा आणि घटनेच्या मूल्यांपासून अधिकाधिक दूरच जाताना दिसत आहे. या प्रकारांना आत्ताच आळा घातला गेला नाही, तर राज्यातील लोकशाही आणि लोकशाही संस्थांचे पूर्ण खच्चीकरण होईल, अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रात राज्यात ज्या लोकांचा अमानुष छळ झाला त्याचा आकडेवारीसह तपशील सादर करण्यात आला आहे.