इंदपूर तालुक्यात एसटी सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
निमसाखर- निरा नदीला आलेल्या पुरामुळे इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या भागातील शैक्षणीक संकुलात (ता. माळशिरस, जि. सोलापूर) पाणी आल्याने शाळा, महाविद्यालय बंद असून विद्यार्थ्यांचे शौक्षणीक नुकसान होत आहे. त्यातच एसटी सेवाही बंद झाल्याने सर्वसामान्यांसह कामगार, शेतकरी यांची गैरसोय होत आहे.
कळंब, निमसाखर, निरवांगी, वालचंदनगर, खोरोची या गावांचा एकमेकांशी तर माळशिरस तालुक्यातील नातेपुते, दहिगाव, बांगार्डे, पळसमंडळ या गावांचा इंदापूर तालुक्याशी संपर्क तुटला असून या भागातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. निमसाखर, कळंब व वालचंदनगर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक व्यापार, व्यवसाय व नोकरी निमित्त तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रेडणी, खोरोची तसेच माळशिरस तालुक्यातील नातेपुते, दहिगाव, कळंबोली येथुन ये-जा करीत असतात. मात्र, नदीला आलेल्या पुरामुळे पुल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. माळशिरस आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा वालचंदनगर-कळंबोली रस्त्यावरील कळंबोली पुल पाण्याखाली गेल्याने परीसरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
निमसाखर,कळंब, वालचंदनगर या ठिकाणी मोठी क्षैक्षणीक संकुलने असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी या ठिकाणी येतात. मात्र, सध्याच्या पूर परिस्थीतीमुळे शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. पूर स्थितीचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला असून निमसाखर, निरवांगी व वालचंदनगर बाजारपेठेसह आठवडी बाजारातील उलाढालही मंदावली आहे.
- स्कुलबसही येत नाहीत…
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्यात अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था पहावयास मिळतात. या शिक्षण संस्था वाहतुकीच्या नावाखाली 8 ते 9 किलोमिटरला आठ हजार रूपयांपर्यंत शुल्क घेतात. मात्र, पुरस्थितीत दूर अंतरावरुन जावे लागत असल्याने अशा शिक्षण संस्थोच्या स्कुल बस विद्यार्थ्यांना नेण्यास टाळाटाळ करीत आहेत, यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.