पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंडा बदलाविषयी जोरदार चर्चा सुरू आहेत. मनसे या पक्षाचा आताचा झेंडा बदलण्यात येणार असून नवीन झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवमुद्रेचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याला सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी आक्षेप घेतला आहे. मनसेने नवीन झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना रयतेच्या हितासाठी स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली. त्या राजमुद्रेचा वापर करूनच स्वराज्याचा कारभार होऊन त्यातूनच रयतेला अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच शिवचरित्रात शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्र शासन देखील याच राजमुद्रेचा प्रशासकीय कामकाजात प्रतिक म्हणून वापर करत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पूर्वीचा झेंडा बदलून नवा झेंडा आणणार आहे. त्याबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही. मात्र या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजाची शिवराजमुद्रा वापरली जाणार आहे हे अत्यंत चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्यावर सर्व जाती, धर्म, पंथ व सर्व विचारधारेच्या लोकांचा समान अधिकार आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. पक्षाच्या कार्यक्रमात भविष्यात उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणाऱ्या ध्वजाचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे पक्षाच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करु नका, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.