- खासगीबरोबर सरकारी दवाखान्यालाही टाळे
नाणे मावळ – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लॉकडाऊन सुरू असताना याच काळात अत्यावश्यक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. एखाद्याला सर्दी, खोकला, ताप आदी झाला असल्यास त्याने तातडीने दवाखान्यात जाऊन शंकेचे निरसन करायला दवाखानेच उघडे नसल्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र संपूर्ण नाणे मावळात दिसत आहे.
नाणे मावळची मुख्य बाजार पेठ असलेल्या कामशेत शहरात तुरळक दवाखाने सुरू आहेत, तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गोवित्री, करंजगाव, सांगिसे येथील दवाखाने पूर्ण वेळ सुरू नसल्याने नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवित्री येथील सरकारी दवाखान्यात अनेक महिन्यांपासून डॉक्टर किंवा नर्सेस येत नाहीत. येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी दररोज दवाखाना उघडून साफसफाई करून पुन्हा घरी जात आहेत. सकाळी दोन ते तीन तास दवाखाना उघडा असून डॉक्टर नसल्याने केवळ दिखावा झाला आहेत.
सांगिसे व करंजगाव येथील उपकेंद्रात प्रत्येकी एक सिस्टर असून, येथील दवाखाने नियमित सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिक गर्दी करीत आहेत. याठिकाणी डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज आदी पुरवण्यात आले नसल्याने ते जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच गर्दी वाढल्यामुळे “सोशल डिस्टसिंग’ राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
हवामानात बदल घडत असून मागील आठवड्यात पाऊस झाला, तर ढगाळ हवामान, कडाक्याचे ऊन, रात्रीची थंड हवा आदींमुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्दी, पडसे, थंडी, ताप आदींसाठी डॉक्टर मिळेनासे झाले आहेत. त्यातच कोणी शिंकत, खोकत बाहेत आलेच, तर त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहिले जात आहे.
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना सेफ्टी डिव्हाइस देण्यात आली नसून, यासंदर्भात गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपत्तीच्या काळातही जर “बीडीओ’ यांचा फोन लागत नसेल, तर सामान्य नागरिकांना जायचं कुठं, आरोग्यसेवा पुरवणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.