राजगुरुनगर -खेड तालुक्यात दोन गावांच्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली आहे. खेड पंचायत समितीकडे टॅंकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
खेड पंचायत समितीकडे मंगळवार (दि. 3) आणि शनिवार (दि. 7) दोंदे गावच्या सैंदाणी ठाकरवाडी, आवळ्याची ठाकरवाडी, तळ्याची आणि हाडवळ्याची ठाकरवाडी, वाशेरे गावच्या 14 वाड्यांपैकी पाटेवाडी, तळपेवाडी येथे पाणीटंचाई समस्या उद्भवू लागल्याने टॅंकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव दाखल झाले आहे.हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी खेड तहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहे.
अद्यापही दोन अडीच महिन्यांचा होणारा कडक उन्हाची तीव्रतेचे संकेत हवामान खात्याने दिले असल्यामुळे काही ग्रामपंचायतीनी बेकायदेशीर होणाऱ्या पाणी उपशाबाबत आक्षेप घेत पाणी उपसाबंद करण्याची मागणी केलेली आहे. टंचाई काळातील वाड्या-वस्त्यांचा आढावा घेऊन परिसरातील जलस्त्रोतामधील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज आतापासूनच प्रशासनाने घेऊन टंचाई नियोजन केले तर निश्चितपणे टॅंकरची संख्या कमी होऊन तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यात यश मिळणार आहे.