कोल्हापूर – कोल्हापुरात या आठवड्यात प्रचाराचे वातावरण चांगलेच तापणार असून ठाकरे बंधूंच्या तोफा या आठवड्यात कोल्हापुरात धडाडणार आहेत तर दुसऱ्या बाजूला महाआघाडीच्या बाजूने शरद पवार आणि राज ठाकरे मैदानात उतरणार असून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापणार आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर भाजप शिवसेनेकडून पकड मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
2014 च्या लोकसभेला कोल्हापूरची जागा मोदी लाट असतानाही हातातून गेली तर हातकणंगलेतून राजू शेट्टी यांच्या रूपाने महायुतीचा खासदार झाला मात्र आता शेट्टीही विरोधात गेल्याने या दोन जागा मिळवण्यासाठी महायुतीने चांगलीच कंबर कसलीय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 6 आमदार विजयी झाल्याने आता संपूर्ण जिल्हाच भगवा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीच्या दमदार प्रचार प्रारंभानंतर उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हातकणंगले मतदार संघात सभा घेणार आहेत तर पुन्हा 20 एप्रिलला कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात सभा होणार आहे.आदित्य ठाकरेही 13 तारखेला युवकांशी संवाद साधणार आहेत.
तर दुसऱ्या बाजूला ह्या जागा राखण्यासाठी शरद पवारही उद्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर येत कागल मध्ये सभा घेणार आहेत.तर राज ठाकरे राजू शेट्टींसाठी 17 तारखेला इचलकरंजीत सभा घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. जयकांत शिखरेची भूमिका साकारणार प्रकाश राज यांची सुद्धा सभा शेट्टींच्या प्रचारार्थ होणार आहे.राज्यातील वरिष्ठ नेते पुन्हा पुन्हा या जिल्ह्याचा दौरा करत आपली ताकद दाखवून देत आहेत.त्यामुळे या आठवड्यात चांगलेच राजकीय वातावरण तापणार आहे.पण मतदार कोणाला कौल देणार यावर या नेत्यांच्या दौऱ्याचे यश अवलंबून आहे हे मात्र नक्की.