शेवगाव – शहरात विविध भागात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या येत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
याबाबत माहिती घेता या आधीच्या घनकचऱ्याच्या टेंडरची मुदत संपल्याने नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आली. मात्र, निविदा काढण्याची प्रक्रिया वेळ काढूपणाची असल्याने नगर परिषदेने अत्यावश्यक सेवा म्हणून आपल्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत कचरा संकलन मोहीम राबवायला हवी.
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेवगाव नगरपरिषदेला 8 इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या अजूनही कचरा संकलनासाठी रस्त्यावर फिरकत नसल्याने याबाबतही नागरिकांतून प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पाऊस लांबलेला असला, तरी कधीही पाऊस होऊन रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवण्याचा धोका असल्याने नगरपरिषदेने तातडीने पावले उचलून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
नगरपरिषदेच्या नगरसेवकांची मुदत तीन वर्षांपासून संपली असून, तेव्हापासून नगरपरिषदेवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर सगळा कारभार प्रशासक आणि मुख्याधिकारी पाहत आहेत. त्यांना जाब विचारणारे सभागृह अस्तित्वात नसल्याने सगळ्याच विकासकामांचा खोळंबा झाला आहे. शहरातील अनेक पथदिवे गेले कित्येक महिने बंद आहेत, तसेच शहरातील अनेक चौकांत हायमॅक्सचे विना दिव्याचे खांब नुसतेच उभे केले आहेत. बाजार वसुली, घनकचरा संकलन योजना आदी विकासकामे रखडली आहेत. नगर परिषदेचे कार्यालय शहरापासून लांब असल्याने तिकडे सहसा कोणी फिरकत नाही. तसेच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचेही जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांतून तक्रारी आहेत.