सातारा – कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी वर्गाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनीही बदलत्या काळानुसार बदल आत्मसात करुन आपली आर्थिक उन्नती साधावी.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम निश्चित होणार आहे, असे मत कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी व्यक्त केले. करोनाच्या संकटामुळे यावर्षी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला नाही तरीही कृषी सभापती मंगेश धुमाळ, कृषी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा दिवस साजरा केला व पुढील काळाही उत्पन्न वाढीसाठी बांधावर जाऊन अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याबाबतची माहिती त्यांनी दिली.
राज्याच्या कृषी विभागाने यावर्षी कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाचे नियोजन केले. यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. शेतकऱ्यांची पीकपध्दती जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा हेतू त्यामागे होता.
त्यानुसार कृषी सभापती मंगेश धुमाळ, सातारा पंचायत समिती सभापती सौ. सरिता इंदलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, अनिल काळे, आत्मा विभागाचे अशोक देसाई, प्रवीण निकम व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शनाचा उपक्रम हाती घेतला. वेगवेगळ्या प्रकारची पिके, आधुनिक पध्दती याची माहिती म्हसवे येथील धनंजय चव्हाण यांनी दिली.
कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत विविध गावांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. बांधावर जाऊन पीक, विविध प्रकल्प पाहण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. अधिकाऱ्यांनी जागच्या जागी त्यांचे निरसन केले. जिल्हा परिषद व कृषी विभागाच्यावतीने राबविलेल्या प्रत्यक्ष शिवार भेटी कार्यक्रमाने शेतकरी वर्गाच्या अडीअडचणी सुटण्यास मदत होत आहे, असे श्री. धुमाळ यांनी सांगितले.