सातारा – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हयातील शेतकरी सभासदांनी आपली कर्ज प्रकरणे स्वहस्ते बॅंकेच्या मुख्य कार्यालयात घेऊन न येता बॅंकेच्या संबंधित शाखेमार्फत मुख्यालयास पाठवून द्यावीत, शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत दि. 31 जुलै 2020 पर्यंत तातडीचे काम असेल तरच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश मिळेल.
याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. जिल्हा बॅंक जिल्हयातील कृषी क्षेत्राची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. बॅंकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने जिल्हा बॅंकेने जिल्हयातील 320 शाखा व 47 एटीएम तसेच मोबाइल एटीएम व्हॅनमार्फत ग्रामीण शहरी भागातील ग्राहक आणि शेतकरी वर्गास लॉकडाऊन कालावधीत बॅंकिंग सुविधा पुरविली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाच्या सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अनुदानाच्या साधारणपणे साडेतीन लाख शेतकरी व ग्राहकांच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत. पीक कर्ज व्याज परतावा रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. या सर्व बॅंकिंग व्यवहारासाठी बॅंकेच्या शाखांमध्ये शेतकरी व ग्राहकांची गर्दी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी बॅंकेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या करोनाचा प्रादूर्भाव सर्व ठिकाणी दिसून येत असून जिल्ह्यातही त्याचा मोठया प्रमाणात प्रसार झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वानी कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. शासनाने करोना नियंत्रणासाठी घोषित केलेल्या नियमावलीचे पालन करणे व सर्वाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने शेतकरी व ग्राहकांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर राखणेची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .राजेंद्र सरकाळे यांनी केलेले आहे.