मंगलदास बांदल : वाघोली येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचार्थ सभा
वाघोली- शिरुर लोकसभा मतदारसंघात विकासाचे तीनतेरा झाल्याने आता जुने फोटो काढून “बनवा-बनवी’चा कितीही पट मांडला. तरी तो जनता उधळून लावणार आणि युवाशक्ती डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी व्यक्त केला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ वाघोली येथील सभेत बांदल बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह कमलाकर सातव, स्वाती सातव, डॉ. चंद्रकांत कोलते, बाळासाहेब सातव, माजी सरपंच जयश्री सातव, माजी सरपंच शांताराम कटके, अर्चना कटके, राजु पाटील, प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या सोनिया धुवानी, महेश ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगलदास बांदल म्हणाले की, 15 वर्षे त्यांनी काय केले? याचा जाब जनता यंदा विचारल्या शिवाय राहणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले. राजू पाटील म्हणाले की, पंधरा वर्षांत विकास झाला नाही, हे सत्य आहे. रस्ता, पाणी, रियल इस्टेट, वाहतुकीसह अनेक प्रश्न जटील बनले आहेत. एक रुपयाचा निधीही खासदारांनी दिलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. डॉ.चंद्रकांत कोलते म्हणाले की, सेझमधून चार हजार एकर जमीन कोणी सोडवली तर शरद पवार यांनीच. पाणी योजनाही पवारांनी आणली. आज ज्या सुविधा आहेत, त्या पवारांमुळेच मिळाल्या आहेत. मग हे खासदार 15 वर्षे काय करीत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यशवंत सहकारी साखर कारखाना का सुरू शकले नाही, या प्रश्नांसह अन्य प्रश्नांबाबत माजी सरपंच बाळासाहेब सातव यांनी खासदार आढळराव यांना जाब विचारला आहे. तर आता भाकरी फिरवत डॉ. कोल्हे यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
- आमचा खासदार डॉ. अमोल कोल्हेच. प्रचारसभांमधून डॉ. कोल्हे यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तेच विजयी होतील अशी खात्री आहे.
– शांताराम कटके, माजी सरपंच, वाघोली