पक्षीय उमेदवारांना धाकधूक : “हाय व्होल्टेज’ लढतीमुळे विजयाचे गणित बिघडणार
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघाची लढत “हाय व्होल्टेज’ झाली आहे. झालेले मतदान पाहता “ठासून’ नव्हे तर “घासून’ अशा पद्धतीने विजयाचा कौल उमेदवाराला मिळणार आहे. चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार, वंचित बहुजन आघाडी आणि नोटा किती मते खाणार यावर विजयी होणाऱ्या उमेदवाराचे गणित अवलंबून असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरु झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील 21 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. यामध्ये 11 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बालेकिल्ला टिकवून ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात पवार घराण्यातील तिसरी पिढी समोर उभी ठाकल्याने हा मतदार संघ चर्चेत आला आहे. घराणेशाही, गाववाला-बाहेरचा, घाटाखालील-घाटावरील असे अनेक “फॅक्टर’ या निवडणुकीत चर्चिले गेले असताना दलित मतांच्या एकत्रीकरणासाठी निवडणुकीत उतरलेली वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचे मताधिक्य बिघडविणार आहे. अपक्ष उमेदवार तसेच गतवेळच्या निवडणुकीतील नोटाला मिळालेली मते पाहता विजयी उमेदवाराला मताधिक्य मिळवणे अशक्य ठरणार आहे.
या मतदार 2009 मध्ये तेरा, 2014 मध्ये अकरा अपक्ष उमेदवार होते. यंदाच्या निवडणुकीत ती संख्या कायम आहे. 2009 मध्ये अपक्षांना 45 हजार 82 मते मिळाली होती. तर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 35 हजार 286 मते मिळाली होती. यावेळीही मतदानाचा टक्का वाढल्याने अपक्षांनाही 50 हजाराच्या आसपास मते मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या मागील दोन्ही निवडणुकांमध्ये एकाही अपक्ष उमेदवाराला आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचविता आले नाही. 2009 च्या निवडणुकीत सक्षम विरोधी चेहऱ्याचा अभाव होता. तर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव होता. त्याचा फायदा शिवसेनेला झाला होता. परंतु, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. पार्थ यांच्यासाठी पवार कुटुंबियांनी मावळात ठाण मांडले होते. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी प्रचार यंत्रणा हातात घेतली होती. एकेका मताला पाचशे रुपयांचा भाव फुटल्याचीही चर्चा होती. एका शिवसैनिकाला पैसे वाटताना पकडण्यात आले होते. सर्वच बाबतीत दोन्ही उमेदवार एकमेकांना पुरुन उरले. यावेळी झालेल्या तुल्यबळ लढतीमुळे एकेका मतासाठी उमेदवारांना झगडा करावा लागणार आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी अशी ही दुरंगी लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते दखलपात्र ठरणार आहे. दलित, मुस्लिम समाजाचे मतदान तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हे घाटाखालील बहुचर्चित चेहरा असलेले आहेत. घाटावरील भागात झोपडपट्टी परिसर, मुस्लिम बहुल वस्ती तर घाटाखालील दलित समाजात काम करणारा उमेदवार यामुळे राजाराम पाटील यांना मिळणारी मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका शिवसेना की राष्ट्रवादीला बसणार याबाबत चर्चा रंगली आहे.
“नोटा’चे करणार तोटा!
2014 मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत “नोटा’ला 11 हजार 186 मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल, उरण वगळता सर्वच विधानसभा मतदार संघामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. “नोटा’बाबतची जागरुकता वाढत असल्याने यावेळीही त्यात मोठी वाढ होण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. केंद्रातील भाजप सरकारविरोधातील नाराजी म्हणून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात नाराजी तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या माध्यमातून घराणेशाहीला विरोध, वंचित बहुजन आघाडीची जातीय समीकरणे यामुळे यावेळी मावळात “नोटा’चा वापर जास्त झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे “नोटा’ नेमका कोणाचा तोटा करणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.