40 प्रवाशांचे वाचले प्राण ः पाच जण किरकोळ जखमी
भोर- भोर एसटी आगारातून सकाळी 10ः00 वाजता सुटलेली बस भाटघर धरणाजवळ असलेल्या सांगवी (ता. भोर) गावाच्या हद्दीत अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याच्या साइड पट्टीत समोरून येणाऱ्या वाहनाला आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांना चुकवताना वाहनचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने उलटली. बसमध्ये सुमारे 40 प्रवाशी होते, यातील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सर्व प्रवाशांना सह्याद्री रेस्क्यू फोर्स, भोरचे सचिन देशमुख, सांगवीचे ग्रामस्थ अक्षय दामगुडे, संजय खरमरे, उमेश होसूरकर, रोहीय गायकवाड आदींनी बाहेर काढले. सर्व जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या सहकार्याने दाखल करण्यात आले असून, बसचालक शिवाजी सुभाष बळी (वय 33, रा. भोर)आणि वाहक मीनाक्षी महेश भस्मे (वय 40, रा. वाई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि पोलीस नाईक गडदे करीत आहेत.
- जखमी प्रवाशांची नावे पुढील
सुमन सुरेश खोपडे (रा. भोलावडे), नवनाथ शंकर काटकर (रा. हारतळी), मुक्ताबाई गणपत भिलारे (रा. रावडी), चंद्रकांत तुकाराम चंनशिव (रा. किवत) आणि मारुती धोंडिबा झुनगारे (रा.सांगवी) भिडे - भोर-कापूरहोळ रस्त्याची चाळण
भोर ते कापुरहोळ या सुमारे 14 कि. मी.अंतराचच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या खड्ड्रात पाणी साचल्याने वाहन चालकांस खड्डे दिसत नाहीत. भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून, या रस्त्यावर कायमच अपघातांचे सत्र सुरू आहे. याविषयी संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते “नॉट-रिचेबल’ होते.