रेडा- इंदापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या चाराचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जनावरांच्या चाऱ्यासाठी व पाण्याच्या शोधात पशुपालकांवर रानोमाळ भटकण्याची वेळ आली असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
इंदापूर तालुक्यात या वर्षी पाऊस झाला नसल्याने पाण्याअभावी चारा पिकासह ज्वारी, मका, कडवळ यांच्या पेरण्या झाल्या नसल्याने जनावरांसाठी लागणारा चारा कमी पडू लागला आहे, त्यामुळे जनावारांच्या चाऱ्यासाठी पशुपालकांना रानोमाळ भटकंती करावे लागत असल्याने शेतकरी घायकुतीला आला असल्याचे वडापुरी, काटी, रेडा, रेडनी, अवसरी, बेडशींग, बाभुळगाव परिसरात पाहावयास मिळत आहे.
दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायावर देखील परिणाम झाला असू, उत्पादनात घट झाली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत आहे आणि त्यामुळेच या परिसरात पशुधन जगविणे मुश्किल झाले असल्याचे पशुपालक आप्पासहेब बंडगर व रवींद्र राऊत यांनी सांगितले. याबरोबरच पाण्याची आणि चाऱ्याची स्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे, त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक अडचणीत आला असल्याचेही त्यांनी सांगितले.