निसर्ग आजवर आपल्याला सढळपणानं असंख्य गोष्टी देत आला. ‘निसर्गाची करणी आणि नारळात पाणी’ अशी म्हणही या निसर्गाच्या चमत्कारावरूनच बनली. नारळात जसं मधुर, पोषक जल त्यानं निर्माण केलं तसंच ताड, माड, खजुरी, शिंदी या झाडांमधून पाझरणारा द्रवही माणसाला पोषक आणि उपायकारक ठरला. यालाच ‘नीरा’ असं संबोधलं जाऊ लागलं. अशा या अमृततुल्य निरेच्या औषधी गुणधर्माविषयी..
भारत हा एकमेव देश आहे की, जिथे नीरेचा पेय म्हणून उपयोग केला जातो. डहाणू जिल्ह्यातल्या आशागड, कोनाड, कोसबाड या गावांमध्ये खजुरी आणि शिंदीच्या झाडांची लागवड खास नीरा काढण्यासाठी केली जाते. त्यामुळे इथे ताजी, शुद्ध स्वरूपाची (भेसळ विरहित) आणि उत्तम दर्जाची नीरा काढली जाते. परंतु भारतातील बहुतांश खेडेगावांमध्ये आजही ताज्या नीरेपेक्षा तिला आंबवल्यावर तयार होणारी ताडी पिणा-यांचं प्रमाण जास्त आहे. नीरेमध्ये असणारे पौष्टिक घटक (नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वं) ताडीमध्ये नसतात. गोड चवीच्या ताज्या नीरेवर आंबवण्याची प्रक्रिया झाल्यावर तयार होणा-या ताडीमध्ये अम्ल, अल्कोहोल (नशा आणणारे घटक) तयार होतात.
नीरा ही सूर्योदयापूर्वी काढली जाते, कारण झाडाला बांधण्यात आलेल्या मडक्यामध्ये गोळा झालेल्या निरेवर सूर्यकिरण पडताच ती आंबण्याची क्रिया सुरू होते. या आंबण्याच्या प्रक्रियेदरम्यान ही मौल्यवान जीवनसत्त्वं नष्ट होतात, शिवाय ती शरीराला अपयायकारही ठरतात. ताडी प्यायल्यानं शरीरावर झालेल्या वाईट परिणामांपासून लोकांना वाचवण्यासाठी ताडीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ताज्या निरेला अधिक जास्त महत्त्व दिलं गेलं.
जिथे ताड, माड, खजुरी, शिंदी ही झाडं उपलब्ध आहेत, अशी गावं, तालुक्यांमध्ये तसंच आसपासच्या मोठमोठ्या शहरांमध्ये नीरा विकण्यासाठी केंद्रं उभारण्यात आली. परंतु आता सर्वत्र इतर शीतपेयं, सरबतं, लस्सी, ताक यांसारखे तहान भागवण्याचे अनेक पर्याय सहज उपलब्ध होऊ लागल्याने काळाच्या ओघात या केंद्रांची संख्या मात्र खूपच कमी होत गेली व त्यातली बरीचशी केंद्रं बंदही झाली. आजही सुरू असलेल्या नीरा केंद्रांमध्ये नीरा विकली जाते. या केंद्राव्यतिरिक्त मात्र कुठेही निरेची विक्री केली जात नाही.
नीरा प्यायल्यावर तरतरी, तजेला वाटतो. निरेची पौष्टिकता तिच्यातील स्फुरद (फॉस्फरस), लोह, साखर, जीवनसत्व ‘क’, ‘ब १’ ‘ब २’ आणि नायसिनवर अवलंबून असते.
निरेमधल्या घटकद्रव्यांचा उपयोग शालेयवयीन मुलांनाही होतो का, हे पाहण्यासाठी या ठिकाणच्या शाळेत जाणा-या १०८ मुलांवर नीरेचा प्रयोग करण्यात आला. डहाणूतील एका मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेनं या प्रयोगासाठी सलग पाच महिने मुलांना निरेचा पुरवठा केला. पाच महिन्यांनंतर या मुलांच्या एकूणच प्रकृतीत सुधारणा झाल्याने रोगप्रतिकारशक्तीचं प्रमाण वाढलेलं आढळलं. कारण ज्या विभागात हा प्रयोग करण्यात आला, इथले बहुतांश रहिवासी हे आदिवासी तसंच गरीब शेतकरी वर्गातले असल्याने अजूनही त्यांच्यात स्वच्छतेविषयीचं महत्त्व आणि जागरूकता म्हणावी तितकी झालेली नाही. म्हणूनच प्रयोग करणा-या मुलांपैकी काही मुलांना खरूज, नायटा यांसारख्या त्वचारोगांची लागण झालेली आढळली. या रोगांच्या प्रादुर्भावाचं प्रमाण या पाच महिन्याच्या नीरा पिण्याच्या प्रयोगानंतर ब-याच अंशी कमी झालेलं आढळलं. निरेमधील ‘क’ जीवनसत्त्व व त्यात अंशत: प्रमाणात घातलेल्या खायच्या चुन्यामुळे मुलांची हाडं तसंच विशेषत: हिरड्या व दातही पूर्वीपेक्षा अधिक बळकट झालेले आढळून आले.
निरेची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, २५० मि.ली. (१ मोठा पेला) नीरेमध्ये पुढील प्रमाणात निरनिराळी महत्त्वपूर्ण घटकद्रव्यं आढळली.
साखर – ३० ग्रॅम
स्फुरद (फॉस्फरस) – ५५ मि. ग्रॅ.
लोह – ६३ मि. ग्रॅ.
‘क’ जीवनसत्त्व – २४ मि. ग्रॅ.
थायामिन (जीवनसत्त्व ब १) – ०.७४ मि. ग्रॅ.
रायबोफ्लोविन जीवनसत्त्व ‘ब२’ – ०.६५ मि. ग्रॅ.
नायसिन – ५५ मि. ग्रॅ.
उष्मांक (कॅलरीज) – १६६