श्रीनगर – श्रीलंकेत साखळी बॉंम्बस्फोट घडवणारे दहशतवादी अलिकडेच काश्मीरातही येऊन गेल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारीत झाल्या आहेत. तथापी अशा कोणत्याहीं नोंदी आमच्याकडे उपलब्ध नाहीत अशी माहिती राज्याचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंग यांनी आज येथे दिली. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला डिप्लोमॅटिक चॅनल मधूनही श्रीलंकेकडून ही माहिती मिळालेली नाही. ज्या दहशतवाद्यांनी काश्मीरात भेट दिली असल्याचे सांगितले गेले आहे ती नावे केवळ सोशल मिडीयातून चर्चीली गेली आहेत. पण त्या नावाचे कोणतेही दहशतवादी काश्मीरात येऊन गेलेले नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही या बातम्यांनंतर इमिग्रेशनचे सारे रेकॉर्ड तपासले त्यात अशा नावाच्या कोणीही व्यक्तींनी श्रीनगर किंवा काश्मीरच्या अन्य कोणत्याहीं भागाला भेट दिल्याच्या नोंदी नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.