माधव विद्वांस
सामाजिक परिवर्तनाचा संदेश आपल्या साध्या सरळ भाषेत समाजापर्यंत पोहोचविणारे महाराष्ट्राचे गुरुजी अर्थात साने गुरुजी यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 मधे दापोली तालुक्यातील पालगड येथे झाला. त्यांचे वडील गावचे खोत होते. काही कारणाने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले, त्यात त्यांचे घरही सावकाराकडे गहाण पडले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर ते अमळनेर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ते इंग्रजी विषयामध्ये एम. ए. झाले होते. अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय झाले. तेथे त्यांच्यावर तेथील वसतिगृहाचीही जबाबदारी सोपविली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याचे धडे दिले. स्वावलंबी होण्याचे त्यांच्या आईने लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या जीवनावर दिसून येतात.
अत्यंत कोमल हृदयाचे साने गुरुजी विद्यार्थ्यात अत्यंत प्रिय होते. उच्च-नीच हा भेदभाव त्यांना त्याज्य होता. स्वतः गरिबीत दिवस काढलेल्या गुरुजींना दीनदुबळ्यांबाबतीत कणव होती. समाजातील विषमता पाहून त्यांना खेद होई. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. वर्ष 1930 मध्ये कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेससाठी काम करायचे ठरविले. फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन (1936) यशस्वी होण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
त्यांच्यात उपजत कवी व लेखक असल्यामुळे त्यांच्या लेखणीतून उतरलेली अनेक गीते आजही लोकांच्या ओठावर आहेत. “बलसागर भारत होवो’ हे राष्ट्रभक्तीपर गीत अनेक शाळांतून आजही सामुदायिकरीत्या गायले जाते. त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व होते. नाशिक तुरुंगात साने गुरुजींनी “श्यामची आई’ लिहिण्यास 9 फेब्रुवारी 1933 (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 (सोमवार) पहाटे लिहून संपविली. आपल्या मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावनांचा संगम “श्यामची आई’ या पुस्तकात दिसून येतो. याच पुस्तकावर “श्यामची आई’ हा चित्रपट आचार्य अत्र्यांनी काढला.
“नवा प्रयोग’, “सुंदर पत्रे’, “हिमालयाची शिखरे’, “क्रांती’, “समाजधर्म’, “आपण सारे भाऊ’ इत्यादी संस्कार घडविणारी पुस्तके त्यांनी लिहिली. याशिवाय त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर गुरुजी धुळे येथे तुरुंगात होते. त्यावेळी त्यांनी केलेली “गीता प्रवचने’ साने गुरुजींनी लिहिली.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांना त्यांनी भाषणातून व लेखनातून त्यांनी विरोध केला. वर्ष 1946 च्या दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व अखेर त्यांना यश मिळाले. “एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. “साधना’ हे मराठी साहित्यातील लोकप्रिय साप्ताहिक साने गुरुजी यांनी सुरू केले. ते पहिले संपादक होते. त्यांचा वैचारिक वारसा आजही साप्ताहिकाच्या माध्यमातून जपला जात आहे.