नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देणार का? अशी चर्चा सुरु असताना भारताकडून बीआयएमएसटीईसी देशांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचा पाकिस्तान हा सदस्य नाही.
नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पहिल्यांदा सत्ता मिळवली तेव्हा त्यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफही भारतात आले होते. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती.
दरम्यान, रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून दोन्ही देशांच्या उन्नतीसाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर, या क्षेत्रात शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी हिंसाचार व दहशतवाद यापासून मुक्त असलेले वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले.