नवी दिल्ली – गेल्याच आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाले आहे. आता सेवा क्षेत्राची उत्पादकताही कमी झाल्याची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राला लागलेले मंदीचे ग्रहण कधी संपणार याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
सेवा क्षेत्राचा एप्रिल महिन्यातील पीएमआय केवळ 51 इतका भरला आहे. मार्च महिन्यात तो 52 होता. एप्रिल महिन्यातील पीएमआय हा सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. खाजगी क्षेत्राकडून मागणीचा अभाव असल्यामुळे गुंतवणूक कमी होत होती. आता गेल्या चार महिन्यांपासून देशभरात सर्व बाबी निवडणूककेंद्री झाल्या असल्यामुळे सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.
मात्र, निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, असे या क्षेत्रातील काही विश्लेषकांनी सांगितले. निक्की ही संस्था सेवाक्षेत्रातील परचेसिंग मॅनेजरकडे आलेल्या ऑर्डरच्या आधारावर हा निर्देशांक तयार करते. याअगोदर सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राचा पीएमआय 51 या पातळीवर गेला होता. मात्र, त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे पीएमआय 50 च्यावर असला तर हे क्षेत्र वाढण्याची शक्यता खुली असल्याचे समजले जाते. गेल्या 11 महिन्यांपासून सेवाक्षेत्राचा पीएमआय सुदैवाने 50 च्या वर आहे.
ही आकडेवारी तयार करणाऱ्या आयएचएस मार्केट या संस्थेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, जरी मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी पातळीवर असल्याचे ह्या आठवड्यात जाहीर झाले असले तरी निवडणुकांनंतर सर्व बाबी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता अधिक आहे. 11 एप्रिल रोजी निवडणुकांचा पहिला टप्पा झाला आणि सर्व टप्पे संपल्यानंतर 23 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
फक्त निवडणुका हेच कारण उत्पादकता घसरण्यासाठी जबाबदार नाही. या क्षेत्रात स्पर्धा बरीच वाढली आहे. त्याचबरोबर भांडवलाचा अभाव असल्यामुळे ह्या क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. सध्या रोजगार निर्मितीतही मरगळ आहे. मात्र, आगामी काळात वाढ होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. महागाई सध्या नियंत्रणात असली तरी आगामी काळात महागाई वाढली तर व्याजदर कमी होण्याची शक्यता मावळते. त्या अवस्थेत भांडवलाच्या उपयोगावर मर्यादा येतील.