पुणे – शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. शिरूर मतदारसंघातून 32 उमेदवारांनी, तर मावळ मतदारसंघातून 27 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. दरम्यान, बुधवारी (दि.10) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. 2 एप्रिल ते दि. 9 एप्रिलपर्यंत मुदत होती. त्यातच शनिवारी गुढीपाडवा आणि रविवार अशा शासकीय सुटी आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवधी कमी मिळाला. त्यामुळे मंगळवारी इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. मंगळवारी मावळ मतदारसंघातून 17, तर शिरूर मतदारसंघातून 19 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
आता शिरूरमधून 32 उमेदवार; तर मावळ मतदारसंघातून 27 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे. यात वैध ठरलेल्या अर्जांनुसार इच्छुक उमेदवारांना शुक्रवारपर्यंत अर्ज माघार घेण्यासंदर्भात मुदत आहे. दि. 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि.23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.