सत्यशील शेरकर ः विघ्नहर कारखान्याकडून दुष्काळग्रस्त भागांमध्ये मदत
निवृत्तीनगर- जुन्नर तालुक्यात पाच धरणे असूनही नागरिकांना तीव्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळेच दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक बांधीलकीच्या नात्याने श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून 2 हजार लिटर क्षमतेच्या सुमारे 50 पाण्याच्या टाक्यांचे जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात, तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्तांना वाटप करण्यात आले. या टाक्यांचे वितरण सोमवारी (दि. 3) करण्यात आल्याची माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती सांगताना सत्यशील शेरकर म्हणाले की, यंदा 1972 पेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती पाहावयास मिळत असून, पाणीटंचाई आणि चाराटंचाईमुळे शेतकरी त्रस्त आहे. अशा परिस्थीतीमध्ये पाळीव जनावरे कशी जगवायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचबरोबर धरणे, तलाव, बंधारे, नद्या कोरड्या ठाक असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज कशी भागावयची या विवंचनेने नागरिक त्रस्त आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी विघ्नहर कारखान्याने नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे. शेतकऱ्यांना आणि दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, याकरीता सामाजिक बांधीलकी म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून मागील आठवड्यात माजी खासदार आणि संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुमारे 12 टन हिरवा चारा पाठविण्यात आला.
यावेळी “विघ्नहर’चे उपाध्यक्ष अशोक घोलप, आदिवासी समाजाचे नेते मारुती वायाळ, हिरडा फॅक्टरीचे अध्यक्ष काळू शेळकंदे,उच्छिलचे माजी सरपंच रोहिदास नवले, कोल्हेवाडीचे सरपंच बुधा शिंगाडे, इंगळूनच्या सरपंच संगीता मुदगुन, वैभव आहेर, पोपट रावते, रघुनाथ पारधी, सीताराम मोरे, बाळू शेळकंदे, दत्ता गवारी, प्रदीप थोरवे, वैभव कोरडे, गजानन हाडवळे जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विकास दांगट आणि अधिकारी यांच्यासह आदिवासी भागातील सुमारे 42 गांवाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, “विघ्नहर’चे सर्व अधिकारी, कामगार, तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.