माजी आमदार लांडे : भोसरी येथे डॉ. कोल्हेंनी मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
भोसरी- सक्षम राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून देणे म्हणजेच विकासाला साथ देणे महत्त्वाचे आहे. खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे करण्याऐवजी प्रश्न झुलवत ठेऊन मतदारांना वेठीस धरले आहे. आता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. डॉ. कोल्हे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी अभूतपूर्व गर्दी केली होती. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त डॉ. कोल्हे यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या निवासस्थानी डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. माजी नगरसेवक पंडित गवळी, वसंत लोंढे, भानुदास फुगे, अंकुश पठारे, नगरसेवक संजय वाबळे, दत्ता साने, माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर बोराटेवस्ती, मोशी प्राधिकरण येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.त्यावेळी महिला आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यावेळी विलास लांडे बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या तीन निवडणुकीत वाढत्या नागरिकीकरणामुळे भोसरीत वाहतूक प्रश्न व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी असावा. हे आता भोसरीकरांना पटले आहे. तीनवेळा खासदार राहिलेल्या आढळरावांनी काय काम केले? हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यापूर्वी भोसरीत मताधिक्य कमी मिळत असल्याची ओरड यंदा होणार नाही. स्थानिक भूमिपूत्र परिवर्तनाची हाक देत असल्यामुळे डॉ. कोल्हे यांना भोसरी मतदारसंघातून मताधिक्य देणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- भोसरी, चिखली, मोशी, चाकण आदी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी एक हक्काचा खासदार म्हणून मला निवडून द्या. त्या माध्यमातून विकास काय असतो हे सर्वांना पाहता येईल.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, राष्ट्रवादी व महाआघाडी , शिरूर लोकसभा मतदारसंघ