टाकळी हाजी- बेट विभागातील शेती ही पाण्याअभावी धोक्यात आली आहे. मागील काळात नद्यांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडले होते.परंतु शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा कमी करून भारनियमन केल्याने पिके कशीबशी जिवंत ठेवली होती. परंतु नदीचे पाणी एक महिन्यात संपल्याने आता शेतकरी अडचणीत आला आहे. यापुढील काळात पिके कशी जगवायची, हा प्रश्न सतावत आहे. आधीच कांदा, डाळिंब पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. विहिरीचे पाणी भूगर्भात खोलवर गेल्याने पाण्याची आशा संपलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत आहेत. नदीतील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे बेट विभागातील काठापूर, पिंपरखेड, जांबूत, फाकटे, टाकळी हाजी आदी गावे दुष्काळाच्या खाईत लोटली जात आहेत.
टाकळी हाजी सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे म्हणाले की, यापुढील काळात शेतामधील पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.