चास कमान- आखरवाडी (ता. खेड) येथे रविवारी (दि. 14) अचानक आलेल्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. दरम्यान, कांद्याचा बाजारभाव वाढेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी कांदा तसाच आरण लावून ठेवला आहे. मात्र, यापुढे वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे कांदा साठवून ठेवता येणेही अशक्य आहे. दरम्यान, रविवारी आसपासच्या परिसरातील शेतकरी देखील कोथिंबीर व मेथीची काढणी करीत असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले त्यातच पावसाचे आगमन होताच शेतमजुरांची चांगलीच धावपळ उडाली होती. तर शनिवारी (दि. 13) पावसाने हजेरी लावल्याने या भागातील शेतकरी वर्ग थोडा का होईना पण सुखावला गेला. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असतानाच पावसाने काही तास हजेरी लावल्याने वातावरण थंडा झाले आहे. असे असले तरी यावर्षी जोरदार पाऊस पडावा हीच अपेक्षा बळीराजाने व्यक्त केली.