टाकळी हाजी -चांडोह येथे बिबट्याने हल्ला करुन दोन शेळ्या आणि एक बोकड ठार मारल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) पहाटे घडली असल्याची माहिती वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी दिली.
राजेंद्र रामभाऊ पानमंद यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. गोठ्याला कंपाऊंड असल्याने बिबट्या हल्ला करण्याची शक्यता फार कमी असतना देखील बिबट्याने जाळीवरुन उडी मारुन आत घुसून ह्या शेळ्यांचा फडशा पाडला. यामध्ये त्यांचे सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा वनरक्षक सविता चव्हाण व वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी केला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला वनविभागामार्फत योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी तालुका वनाधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. बिबट्याचे हल्ले वारंवार होत असल्याने या परिसरात पिंजरे लावण्याची मागणी पोलस पाटील सुदर्शन भाकरे यांनी केली आहे.