- भाजीपाला मातीमोल : मावळातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट
पवनानगर – संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या महाभयंकर करोना विषाणूचा देशासह महाराष्ट्रात वाढता प्रार्दुभाव व फैलाव सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कोसळले आहे. आज दुपारी जोरदार वादळी वारा, मेघगर्जनासह विजेच्या कडकडाटात मावळात सर्वत्र जोरदार अवकाळी पावसाने आरोळी दिली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारांचाही वर्षाव झाला.
करोनामुळे भाजीपाला निर्यात बंद झाल्याने शेतात तयार झालेले बागायती पीक काढणी व तोडणी अभावी तसेच खितपत पडले असताना त्यात अवकाळी पावसाची अवकृपा झाल्याने मावळातील भाजीपाला, फळभाज्या व अन्य बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मावळतील सर्व शेतकरी करोनाच्या कोपानंतर अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडला आहे. त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
करोना विषाणूचा वाढता प्रादृर्भाव व फैलाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) रात्री संपूर्ण देशात “लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळे देशातील काही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा व सुविधा बंद करून संपूर्ण देशाला 21 दिवस स्वत:च्या घरातच कैद करून राहण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे देशातील सर्व स्तरातील जनतेसह देशाचा अन्नदाताही या महाभयंकर करोनाच्या दहशतीने पूर्णपणे धास्तावला आहे.
शेतात हातातोंडाशी आलेले सोन्यासारखं पीक तयार आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर पीक तयार असून, देशापुढे उभे राहिलेले जैविक संकट अधिक बिकट झाल्यामुळे बाजारपेठा व दळणवळण सेवा बंद झाल्या. त्यामुळे शेतातील शेतमाल, बागायती पिके, मेथी, पालक, शेपू, करडई, माट, कोथिंबीर या पालेभाज्या व टोमॅटो, बटाटे, वांगी, काकडी, फ्लॉवर्स, कोबी, कांदे, लसूण व अन्य फळभाज्या शेतात सडू लागल्या आहेत. याशिवाय उभ्या पिकांचा खच शेतात तसाच पडून राहिला असताना मावळात बुधवारी (दि. 25) दुपारी जोरदार वादळी वारा, मेघगर्जनासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पाऊस कोसळला.
मावळ तालुक्यातील तळेगाव, देहूरोड, सोमाटणे, वडगाव, कामशेत, मळवली, लोणावळा व खंडाळा या शहरी व निम शहरी भागांसह पवन, आंदर व नाणे या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वादळी जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस पडला. सुमारे दोन तास अवकाळी पावसाने मावळला झोडपून काढले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील भाजीपाला, फळभाज्यांचा चिखल झाला आहे. उरले-सुरली अन्य पीकही अवकाळी पावसामुळे पाण्यात गेली.
“अवकाळी’मुळे शेतकरी वर्गाचे पूर्ण कंबरडेच मोडले असून, शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. करोनामुळे संपूर्ण देशच संकटात असताना कोणाकडे मदत मागायची अशा संभ्रमात शेतकरी वर्ग अडकला आहे. देश करोनातून मुक्त होवून देशावरील हे जैविक संकट दूर व्हावे हीच प्रार्थना शेतकरी वर्गांसह संपूर्ण देश करीत आहे. दोन दिवसांपासून जाणवणारा उकाड्यामुळे हैराण झालेल्यांना कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे, हे वास्तव आहे.