पाऊस, पुराने फुलशेतीचे नुकसान : टंचाईने ग्राहकांची तारांबळ, विक्रेत्यांची घालमेल
गणेशोत्सवात फुलांची टंचाई?
फुलांची टंचाई निर्माण झाल्यामुळे गणेशोत्सव काळात फुलांचे दर गगनाला भिडणार आहेत. शेतकऱ्यांनी आता फुलांची लागण केली तरी दसरा आणि दिवाळीपर्यंत फुले काढणीस येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे, पुढील महत्वाच्या तिन्ही सणामध्ये फुलांची टंचाई भासण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तवण्यात येत आहे.
पिंपरी – गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नकदी पिकांबरोबरच फुलशेतीचेही मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या फुलांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत; परिणामी सध्या बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली; परिणामी बाजारात फुलेच उपलब्ध नसल्यामुळे झेंडू, निशिंगध आणि गुलछडीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात गणेशोत्सव, महालक्ष्मीचा सण असल्याने ऐन सणासुदीतच फुलांचे दर दुप्पट झाल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
साधरणत: श्रावण महिन्यापासून विविध सणांला प्रारंभ होत असल्याने शेतकरी मे महिन्यातच विविध फुलांची लागवड करीत असतात. ही फुले तीन महिन्यानंतर काढणीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना श्रावण महिन्यात तसेच त्यानंतर दिवाळीपर्यंत फुलांचा हंगाम सापडतो. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी फुलबांगाची लागवड केली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यासह मावळ परिसरात चांगलेच थैमान घातले होते.
या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, शेतपिकांबरोबरच फुल बागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक फुलबागा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे फुलांचे नुकसान झाले. तर मराठवड्यात पावसाअभावी अनेक ठिकाणच्या फुलांच्या बागा करपून गेल्या. त्यामुळे, आता आता श्रावण महिना संपत आलेला असतानाच फुलांची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. काही दिवसांत गणेशोत्सवास सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, यावर्षी फुलांची मोठी टंचाई जाणवू लागल्याने फुल विक्रेत्यांची आत्तापासून घालमेल सुरु झाली आहे.