मांडवगण फराटा – शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर तुटून पडलेल्या वीज वाहक तार दुचाकी अडकून धक्का बसल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विश्वनाथ याच्या मृत्युमुळे कुटुंबाचा आधार हिरावल्याने गावकरी संतापले आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.
विश्वनाथ चौरंग चव्हाण (वय 28), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विश्वनाथ हा शेती व्यवसायाबरोबरच हमालीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री कांद्याची गाडी भरण्यासाठी तो सायंकाळी गेला होता. रात्री काम उरकून तो आपल्या दुचाकीवरून मित्राला त्याच्या घरी सोडवण्यासाठी गेला होता. मित्राला सोडवून परत येताना रस्त्यावर विद्युत तार तुटून पडली होती. या तुटलेल्या विद्युत तारेत त्याची दुचाकी अडकली. विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच कुटुंबीयांना माहिती कळाली.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, महावितरणचे न्हावरे शाखा अभियंता बाळासाहेब टेंगले व वडगाव रासाईचे शाखा अभियंता सुयश मुंगसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र माने यांनी महावितरणची तार तुटल्यानेच युवकाचा प्राण गेला असून त्यास शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
महावितरणमुळे बळी
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी विद्युत तारा या जीर्ण झाल्या आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण अधिक आहे. महावितरण विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहेत. महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा बळी गेल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला आहे.