नवी दिल्ली – सध्या कारागृहात असलेले समाजवादी पक्षाचे आमदार आझमखान यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून या अर्जाबाबत उत्तरप्रदेश सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पुढील मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल. तोपर्यंत राज्य सरकारने हे उत्तर द्यावे असेही सुचवण्यात आले आहे. आझम खान हे गेले दोन वर्ष कारागृहात आहेत. त्यांना तेथे का डांबुन ठेवले आहे? हे काय चालले आहे? असा सवालही कोर्टाने उत्तरप्रदेश सरकारला आज विचारला. त्यावर त्वरीत उत्तर द्या असेही कोर्टाने राज्य सरकारला खडसावले.
एका खटल्यातून जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्यांना कारागृहात डांबून ठेवले जात आहे. आझम खान यांच्या बाबतीत हे सत्र सतत चालू ठेवले गेले आहे अशा शब्दात एका न्यायाधिशाने उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे मारले आहेत. आझम खान यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीस विलंब केला जात असून या प्रकारे न्यायाचीच थट्टा केली जात असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे..