माऊलींना भक्तीमय वातावरणात निरोप : अलंकापुरी सुनीसुनी
एम. डी. पाखरे
आळंदी – होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।
काय करावी साधने । फळ अवघेची येणे ।।
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी (दि. 12) पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी माऊलींना भावपूर्ण निरोप दिला. माऊलींना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. माऊली आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाल्याने अलंकापुरी सुनीसुनी वाटत आहे. दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 11) सायंकाळी प्रस्थान सोहळा करून आजोळघरात पहिल्या मुक्कामासाठी पोहोचला होता. रात्री पालखी मुक्कामी त्यानंतर जागर झाला. (दि. 12) पहाटे पहाटेचं आल्हाददायक वातावरण, दिंड्यांमधून ऐकू येणारे अभंगांचे स्वर व दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दीत पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पादुंकावर गांधी परिवाराकडून महापूजा झाली.
काकडा आरतीनंतर पालखी आळंदीकांनी खांद्यावर घेऊन नगरपरिषद चौकातील आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात विराजमान झाली. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी माऊलींच्या पालखीच्या चांदीच्या रथाचे सारथ्य मुख्याधिकारी केंद्रे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, युवा कार्यकर्ते राहुल चव्हाण, बैल जोडीचे मानकरी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, संतोष भोसले आणि रोहित भोसले यांनी केले. पहाटेपासूनच नागरिक आळंदी महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते.
नगरपरिषद चौकातून सोहळा पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. नऊच्या सुमारास पालखी थोरल्या पादुका येथील मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. तिथे न्याहरी केल्यानंतर सोहळा पुढे निघाला. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (देवकृपा सर्विस स्टेशन) यांचे तर्फे भाविकांना प्रथम अन्नदान व पालखी पंढरीकडे मार्गस्थ होताना शेंगदाणा लाडूचे वाटप केल्याचे देवकृपा सर्विस स्टेशनचे सर्वेसर्वा प्रकाश काळे यांनी सांगितले.
स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक
आळंदी पालिकेतर्फे आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. पर्यावरणपूरक, प्लॅस्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक केली होती. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका व अग्निशमन बंब आणि जवान आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी
आळंदीपासूनच रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक व महाविद्यालयीन तरुणाई पालखीजवळ सेल्फी व फोटो काढताना दिसले. स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा व नाश्ताचे वाटप केले. भक्तीमय वातावरणात अलंकापुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीला निरोप दिला.