गुवाहाटी: मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरु असणाऱ्या हिंसाचाराने देशात गदारोळ माजला आहे. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना “मणिपूरमधील हिंसाचार भारतीय लष्कर एक ते दोन दिवसांत थांबवेल,” असे म्हटले होते. याचा संदर्भ देत सर्मा म्हणाले की, “मणिपूरमध्ये गेल्या शंभर दिवसांपासून सुरु असलेला हिंसाचार भारतीय लष्कर थांबवू शकत नाही. राज्यात बंदुकीने नाही, तर प्रेमातून आपल्याला ही समस्या सोडवता येईल. ” असे म्हणत त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
भारतीय लष्कर मणिपूरमधील समस्या सोडवेल असे म्हणत आहेत. पण, मणिपूरमधल्या नागरिकांवर सैन्याने गोळीबार करावा असे राहुल गांधी यांना सुचवायचे आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मिझोराममध्ये १९६६ मध्ये हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्बहल्ला करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मणिपूरमधील नागरिकांवर हल्ला करावा अशी इच्छा राहुल गांधी यांची आहे का, असा प्रश्न आसाम मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सर्मा पुढे बोलताना म्हणाले, ‘राहुल गांधी यांना मणिपूरमधील हिंसाचार भारतीय सैन्याच्या माध्यमातून सोडवायचा आहे. याचा अर्थ नागरिकांवर गोळीबार करावा का? राहुल गांधी हेच सुचवत आहेत का? लष्कर काहीही करु शकणार नाही. याने समस्या थोड्या काळासाठी सोडवता येईल. पण, तुम्हाला कायम स्वरुपी यावर तोडगा काढायचा असेल तर बंदुकीच्या गोळीच्या माध्यमातून नाही तर प्रेमाने ही समस्या सोडवता येईल.असे म्हणाले.
विरोधक म्हणत होते की, ‘पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर विषयावर लोकसभेत बोलावं, पण जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा विरोधक संसद सोडून गेले. यातून विरोधकांचा हेतू समोर आला. त्यांना मणिपूरशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त संसदेत गोंधळ निर्माण करायचा आहे. त्यांना मणिपूरबाबत प्रेम नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. पंतप्रधान मोदी मनातून बोलत होते. त्यांना खरंच ईशान्येकडील नागरिकांबाबत प्रेम आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.