अरुण गोखले
चातुर्मासातील उपवासाइतकेच या कालावधीमधील उपासनेलाही महत्त्व आहे. कारण उपवासाने आपले शारीरिक आरोग्य संयमित राखले जाते. तर उपासना आपल्या मनाची प्रसन्नता, मनोबल, वाढविण्यास मोलाची मदत करते. मानवी जीवनातल्या सुखासमाधानाच्या कल्पना पूर्तीसाठी शरीर अन् मन:स्वास्थ्याची आपल्याला नितांत आवश्यकता असते.
या कालावधीत विविध उपासनांचा समावेश करण्यात आलेला आहे. उपासना या शब्दाचा गुढार्थही इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे होय. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते की, असे जवळ बसणे ही केवळ शारीरिक नव्हे तर वैचारिक बैठक साधणे, हे इथे अभिप्रेत आहे.
आपण कामधंदा, व्यवसाय, लोकव्यवहार सोडायचे नाहीत तर प्रत्येक कर्माची नामाशी जोड घालणे ते कर्म ईश्वरार्पण करणे हीच निरपेक्ष उपासना घडायला हवी. या दिवसात उदईक केले जाणारे स्नान, पूजा, छोटेसे धार्मिक स्तोत्रांचे वा पोथीचे वाचन. नामस्मरण, देवदर्शन यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीही आपल्या मनाची प्रसन्नता, उत्साह, उमेद वाढविण्यासाठी मदत करीत असतात.
“मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।’ हे समर्थांचे वचन तर आपल्याला सर्वश्रुत आहेस. या चार महिन्यांच्या कालावधीमधील ज्याच्या त्याच्या आवडीची देवता आणि त्या देवतेच्या कृपाप्रसादास्तव केली जाणारी उपासना ही त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक बल वाढविण्यासाठी मदत करते. स्तोत्र पठणाने वाणी शुद्ध होणे, स्मरणशक्ती वाढणे, मन:शांती एकाग्रता साधली जाणे, ह्या गोष्टी सहज घडून येण्यास मदत होते. छोट्या पोथी वाचनाने कळत-नकळत त्या देवतेबद्दलची श्रद्धा दुणावते. निष्ठा, आपलेपणा, माझे उपास्य दैवत, माझे पाठीराखे आहे, ही एक सुरक्षिततेची भावना आपले मनोबल वाढवून जाते. त्यामुळे मनाची चंचलता, भीतरेपण, अस्थिरता दूर होते.
उपासना ही निष्ठेने करीत, वाढवीत आणि तिच्यात मनोभाव समर्पित करीत गेले की ईश्वरी कृपा प्राप्त होण्यास मदत होते. उपासनेचा काळ हा आपल्याला संयम, नियमितपणा, सातत्य ह्या सारख्या गोष्टी शिकवून जातो. मनोनिग्रह वाढला, मन प्रसन्न झाले की नकळत कार्यशक्ती, उत्साह वाढीस लागतो. कार्य लक्षपूर्वक, सातत्याने, प्रामाणिक प्रयत्नाने फलदायी केले जाते. कर्तव्य, कार्य, भक्ती उपासना ही सातत्याने केल्याचे एक सात्विक समाधान आपला आनंद द्विगुणित करते.