रायपूर – छत्तीसगढचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांनी या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाची तुलना क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवाशी केली आहे. स्पर्धेत भारत सगळे सामने जिंकला होता, मात्र केवळ अंतिम सामन्यात पराभूत झाला. तसेच आमचे झाल्याचे ते म्हणाले.
एकजुटीच्या मुद्द्यावर भर देताना ते म्हणाले, कॉंग्रेसचे नेते एकजुटीने सामूहिक नेतृत्वासारखे काम करत होते. कोठेही विस्कळीतपणा नव्हता. आदिवसाींच्या मतांची विभागणी झाली असे आता म्हटले जाते आहे. मात्र त्याचे प्रमाण मर्यादीत आहे.
शहरी भागात आमची कामगिरी चांगली झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली, तथापि, महत्वाच्या लढतीत आमचा पराभव झाला. हे विश्वचषक स्पर्धेसारखेच झाले. स्वत: सिंहदेव अंबिकापूर मतदार संघातून केवळ ९४ मतांनी पराभूत झाले आहेत.
वरिष्ठ नेत्यांच्या एकजुटीचा फायदा होतो का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की निश्चितच फायदा होतो. एकजुटीने उभे असलेले घर हे वाटण्या झालेल्या घरापेक्षा कधीही चांगलेच असते. सामान्यत: प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक वेळी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे.
तुमच्यात खरेच एकी आहे की तो दिखावा आहे हे लोकांना चटकन समजते. दिखाव्याच्या गोष्टी चालत नाहीत. तुम्हाला खरेच एकजुटीने राहावे लागते. कोणा दोन व्यक्तींनीच फक्त ही एकजुट दाखवली पाहिजे असे नाही तर संघटनेतील प्रत्येक स्तरावर ही एकी दिसली पाहिजे असे त्यांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
छत्तीसगढमधील कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कोणा एकाची नसून ती सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही ती टाळू शकत नाही आणि दुसऱ्या कोणावर लादू शकत नाही. अंबिकापूर, सरगुजा येथील पराभवासाठी मला सर्वप्रथम जबाबदार धरले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.