नवी दिल्ली – कलम 370 हटवल्यानंतर सकारात्मक बदलाचे वारे वाहत असताना काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. नवीन प्रणालीनुसार, प्रथमच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतर्गत सरकारची निवड करण्यात शहरी महिला पुढे असतील. श्रीनगर महापालिकेत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा कमी असली तरी सर्व 10 जिल्ह्यांमध्ये मिळून महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जम्मू विभागातील किश्तवाड आणि पुंछमध्येही महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2.57 लाख मतदार वाढले आहेत. खोऱ्यातील शांततापूर्ण वातावरण, दगडफेक आणि दहशतवादी घटना थांबवणे, फुटीरतावाद्यांनी पुकारलेले बंद यामुळे महिलांमधील भीती आणि दहशतीचे वातावरण संपले आहे. यामुळे त्यांनी मतदार होण्यात अधिक रस दाखवला आहे. काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, कुपवाडा, बांदीपोरा, बारामुल्ला, गंदरबल, बडगाम, पुलवामा, शोपियान, कुलगाम, अनंतनाग येथे पाच लाख 85 हजार महिला मतदार आहेत, तर 2023 च्या मतदार यादीनुसार पाच लाख 82 हजार पुरुष मतदार आहेत.
श्रीनगर महानगरपालिकेत 3,75,784 पुरुष आणि 3,70,927 महिला आहेत. किश्तवाडमध्ये 4946 पुरुष आणि 5600 महिला आणि पूंछमध्ये 6806 पुरुष आणि 6839 महिला आहेत. नागरी निवडणुकीसाठी मतदार पुनरिक्षणानंतर 19,14,383 महिला आणि पुरुष मतदार झाले आहेत. 2018 च्या निवडणुकीत त्यांची संख्या 16,57,895 होती म्हणजेच 2,56,488 मतदार वाढले आहेत.
काश्मीरवर करडी नजर असणारे प्रा. हरिओम हा बदल आश्चर्यकारक असल्याचे सांगतात. कलम 370 हटवल्यानंतर गेल्या चार वर्षांत खोऱ्यातील वातावरण शांततापूर्ण आहे. आता लोक स्वतःचे जीवन जगत आहेत. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. ना दहशतवाद्यांचा ना फुटीरतावाद्यांचा. लोक स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. त्यामुळे लोकशाहीत महिलांचा वाढता सहभाग दिसून येत आहे.