जामखेड – ज्वारीचं खळं सुरू असताना मळणीयंत्रात पदर अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुबाई बजरंग कोल्हे (वय-42, रा. कोल्हेवाडी) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळं सुरू होते. कुटुंबातील लोक मळणीयंत्रावर काम करत होते. यावेळी सिंधुबाई या खळे संपत आले असताना मळणी यंत्राखालील भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर आणि मळणीयंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते तेथे त्यांचा पदर अडकला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.