अमरावती : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. याआधील अमरावती जिल्ह्यात 1 मार्चपर्यंत लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, करोनाचे रूग्ण वाढत असल्याने लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय अकोला, अकोट आणि मुर्तीजापूर येथेही लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 आणि 6 मार्च रोजी परिस्थितीची माहिती घेतली जाईल. त्यानंतर पुढे लाॅकडाऊन वाढवावा कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासात 16 हजाराहून अधिक नवीन करोना रूग्णांची नोंद झाली आहे. सलग तीन दिवसांपासून रूग्णांचा आकडा वाढताच असल्याचे दिसत आहे.
देशात करोना रूग्णांची संख्या वाढून 11,079,979 झाली आहे. याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अगोदरपासून लागू असलेल्या गाईडलाईन्सची तारीख 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी सांगितले की, गेल्या 24 तासात देशात करोनाचे 16,488 नवीन रूग्ण वाढले आहेत.
अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे जेथे करोनाचे अधिक रूग्ण आहेत. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतीयांची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्र हे करोनाचे केंद्र बनत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचे 8000 हून अधिक रूग्ण वाढले आहेत. याशिवाय मुंबईत देखील 1000 हून अधिक नवीन प्रकरणं समोर आली आहेत. महाराष्ट्रा व्यतिरिक्त केरळ, छत्तीसगढ, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही करोनाबाबत चिता वाढली आहे.
केरळ मध्ये 3600 हून अधिक नवीन रूग्ण आढळले आहेत. करोना रूग्णवाढीत केरळ हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपुर, अमरावती या शहरांत करोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात करोनाचे संकट वाढले आहे.