पेशावर :- मित्राशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या भारतीय महिलेवर पाकिस्तानमध्ये बक्षिसांची खैरात केली जाऊ लागली आहे. तिला रोख रकमेबरोबर भूखंडदेखील बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.
आता फातिमा बनलेल्या अंजू या महिलेने 25 जुलै रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अप्पर दीर जिल्ह्यातल्या नसरुल्ला या 29 वर्षीय युवकाबरोबर निकाह केला आहे. या दोघांची ओळख 2019 मध्ये फेसबुकच्या आधारे झाली होती.
शनिवारी, खैबर पख्तूनख्वा येथील रिअल इस्टेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहसीन खान अब्बासी यांनी अंजू आणि नसरुल्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि अंजूला एक चेक सादर केला, त्याची रक्कम समजू शकलेली नाही.
पाकिस्तानात घर असल्याची जाणीव करून देण्यासाठी तिला तिच्या पतीच्या उपस्थितीत तिला जमिनीचे कागदपत्र दिले गेले. ही जमीन 10 मारला (अंदाजे 2,722 चौरस फूट) आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर नवीन आयुष्याला सुरुवात करताना तिला अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून ही जमीन दिली गेल्याचे अब्बासी यांनी सांगितले.