पुणे – गडचिरोलीतील चकमकीत मारला गेलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिद तेलतुंबडे हा पुण्यात कार्यरत होता. त्याने जिल्ह्यात 15 दिवसांचे नक्षलवादी शिबिरही घेतले असल्याचे महाराष्ट्र पोलिसांकडील नोंदीत आढळून आले आहे, त्यामुळेच पुण्यातील नक्षल प्रसाराचा मुद्दा तेलतुंबडेच्या मृत्यूने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
माओवाद्यांच्या बंदी घातलेल्या संघटनेचा हा म्होरक्या त्यावेळी गोल्डन कॅरिडोर कमिटीचे काम पहात असे. ही कमिटी पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, सुरत आणि अहमदाबाद अशा शहरांतून माओवाद्यांची भरती करत असे. 2011मध्ये मिलिंदची पत्नी अँजेला आणि तिच्या काही सहकाऱ्यांना महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाने अटक केली होती. त्यात पुण्यातील कबीर कला मंचच्या सदस्यांचा समावेश होता, त्यांचा सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यातील संतोष शेलार उर्फ विश्व आणि प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप हे गडचिरोली आणि छत्तीसगढमधील जंगलात सशस्त्र माओवाद्यांच्या गटात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांद्वारे गुन्हे दाखल केले आहेत.
एटीएसच्या चौकशीनुसार, मिलींद तेलतुंबडे उर्फ ज्योतिबा उर्फ दीपक आणि अँजेला उर्फ इस्कारा उर्फ राही यांनी कबीर कला मंचमध्ये शिरकाव केला. त्यांनी त्यातील काही सदस्यांना बंदी घातलेल्या माओवाद्यांच्या संघटनेत येण्यासाठी प्रोत्साहित केले. मिलिंद आणि अँजेला यांनी 2010 मध्ये खेड तालुक्यात 15 दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला होता. शिक्षक प्रशिक्षण शिबिराच्या नावाखाली घेतलेल्या या शिबिरात माओवाद्यांची कार्यपद्धती समजावण्यात आली होती. पोलीस आणि निमलष्करी दलांवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांचा “ब्लेझींग ट्रेल’ नावाचा व्हिडिओ त्यात दाखवण्यात आला.
या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विधानसभेचे तत्कालीन सभापती आणि सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बातम्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 13 एप्रिल 2012ला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याचा अहवाल पटलावर ठेवला. त्यात 15 दिवसांचे शिक्षक प्रशिक्षण शिबिर खेड तालुक्यातील बनगरवाडी येथे पार पडले. त्यात नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करण्यात आले. मोस्ट वॉंटेड मिलिंद तेलतुंबडे या शिबिराला उपस्थित होता, असे नमूद करण्यात आले.
अँजेला आणि कबीर कला मंचच्या अन्य सदस्यांची नंतर जामिनावर सुटका वेगवेगळ्या न्यायालयांनी केली. त्यातील काही जणांना एल्गार परिषद प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपी क्र.11 म्हणून मिलिंद तेलतुंबडे यांचे नाव होते.
महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या अरूण भेलके आणि कांचन ननावरे या माओवादी दाम्पत्याच्या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडेचे नाव समोर आले. ननावरे यांचा मृत्यू 24 जानेवारी 2021ला दीर्घकालीन आजाराने झाला. भेलकेला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यात साक्ष देताना निरंगसाई मडवी उर्फ गोपी आणि कृष्णा उर्फ बिरजू दोरपटे या शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी भेलके उर्फ रंजन हा तेलतुंबडेचा निकटचा सहकारी असल्याचा जबाब दिला होता. हा वेगवेगळ्या नावाने प्रवास करत असे. शहरातून माओवाद्यांची भरती करून तो त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असे, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार…
एल्गार परिषद झाल्यानंतर कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचार भडकला होता. या परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. त्यात 23 जणांना अटक करण्यात आली. त्याचा तपास नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यांनी आणखी सात जणांना अटक केली होती. त्यात मिलींद यांचा भाऊ आनंद तेलतुंबडे याचा समावेश होता. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी 2018 ला कॉम्रेड एम. यांनी लिहलेले पत्र रोना विल्सन यांच्याकडून हस्तगत केल्याचा दावा पोलिसांनी केला. हा कॉम्रेड एम म्हणजे मिलीद तेलतुंबडे होता. त्यात भीमा कोरेगाव निदर्शने ही परिणामकारक झाल्याचा त्यात उल्लेख होता, असे पोलिसांचे म्हणणे होते.