हिमांशू
“जब वक्त ही तुम्हारा चल रहा हो खराब… तो महंगी घडी किस काम की है जनाब?’ बघितलंत…? वेळ आली की माणूस शायरसुद्धा होतो! दुबईहून परतलेल्या भारतीय क्रिकेट संघाचं “हार्दिक’ स्वागत करताना हा शेर उपयोगी पडला असता. पण विमानतळावर आपल्यासारख्याचं काय काम? स्वागत करायला कस्टमचे अधिकारी होते ना! त्यांनाही संघाचा “खराब वक्त’ दिसला नाही… हार्दिक पंड्याची महागडी घड्याळं तेवढी दिसली.
दोन मनगटी घड्याळांची किंमत पाच कोटी रुपये! ऐकूनच मनगट दुखायला लागलं. अधिकाऱ्यांनी म्हणे त्याला पावत्या दाखवायला सांगितल्या; पण त्या तो दाखवू शकला नाही. प्रश्न विचारले तर त्यांची व्यवस्थित उत्तरं देऊ शकला नाही. विचारणाऱ्यांनी किमान मनःस्थितीचा तरी विचार नको का करायला? क्रिकेटचे सामने वगैरे बघतात की नाहीत अधिकारी? पुढचा-मागचा विचार न करता भरमसाठ प्रश्नांचा भडीमार केला असेल.
अशा तोफखान्यापुढे कोण काय बोलू शकणार? मग अधिकाऱ्यांनी दोन्ही घड्याळं ताब्यात घेतली आणि मग आम्हाला कळलं, की प्रश्नांची उत्तरं हार्दिक पंड्याकडे होती. मुद्दामच त्यानं ती दिली नाहीत. वास्तविक टी-20 विश्वचषक स्पर्धेत मनाला झोंबण्यासारखी “कामगिरी’ झाल्यानंतर खेळाडूंच्या मनावर फुंकर घालायला कुणी आलं का? एकटे राहुल गांधी वगळता सगळ्यांनी फक्त तोंडसुख घेतलं. कसली-कसली मिम्स तयार करून फिरवली सोशल मीडियावर!
आधीच निराशा; त्यात पुन्हा टोमणे! या सगळ्याचा मनावर किती ताण आला असेल. तो सैल करण्यासाठी सोडला थोडा सैल हात… केली थोडीफार खरेदी! म्हणून काय आभाळ कोसळलं की काय? त्यात ही मंडळी पावत्या मागणार! समोर एवढी सुंदर घड्याळं असताना तरी वेळ-काळ पाहाल की नाही? मनःस्थितीचं सोडा; कुणी दमणुकीचासुद्धा विचार करत नाही. आधी आयपीएलचे उरलेले सगळे सामने. त्यानंतर लगेच टी-20 वर्ल्ड कप!
“ब्रीदिंग स्पेस’सुद्धा मिळाला नाही. आणि सोशल मीडियावर मागणी काय झाली? म्हणे, आयपीएलच बंद करून टाका! सगळे म्हणाले, “आयपीएलमध्ये पैशांचा मामला असल्यामुळे सगळे मन लावून खेळतात. पुढच्या वर्षीच्या लिलावात आपली किंमत जास्तीत जास्त लागली पाहिजे, असा प्रयत्न करतात. मग आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी हाराकिरी करतात.’ खेळ म्हटलं की हार-जीत चालणारच! पण चुकून कुणी असं म्हटलं तर “पराभवाचं काही नाही;
पण इतका एकतर्फी?’ अशा कमेन्ट यायच्या. एवढ्या सगळ्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी एक मनाजोगी वस्तू विकत घ्यावी म्हटलं तर अधिकारी विमानतळावर अडवणार! घरी गेल्याबरोबर हार्दिकने ट्विट केलं ना? घड्याळांची किंमत पाच कोटी नसून, दीड कोटी आहे हे सांगितलं ना? मग पावत्या कशाला हव्यात?
या निमित्तानं माध्यमांमध्ये एक नवीनच चर्चा सुरू झाली. टीम इंडियामध्ये कुणाचं घड्याळ किती किमतीचं आहे, याची! विराट कोहलीचं घड्याळ साडेआठ लाखांहून अधिक किमतीचं, धोनीचं सव्वानऊ लाखांचं, कुणाल पंड्याचं नव्वद लाखांचं, रोहित शर्माचं साडेदहा लाखांपेक्षा अधिक किमतीचं आणि आता ही कोट्यवधींची घड्याळं. क्षेत्र कोणतंही असो, माध्यमांत महत्त्वाचे विषय मागे पडणारच! असो, काळाशी मैत्री करण्याचा प्रयत्न सगळेच करताहेत. त्यांचा चांगला टाइम यावा, एवढीच इच्छा!
Remarks :