दास म्हणजे गुलाम. दास म्हणजे बंदिवान. असाच अर्थ रूढ झाला आहे. परंतु रामदास म्हणजे रामाचा गुलाम नव्हे. दास म्हणजे सेवक. समर्थ रामदासांनी स्वतःला रामाचा सेवक अर्थात दास मानले. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी ईश्वराचा दास व्हावे लागते. त्याची मनोभावे सेवा करावी लागते. आराधना करावी लागते. सेवकत्व म्हणजे दास्यत्व स्वीकारलं जातं. लादलं जात नाही आणि त्यामुळेच या जगात कोणीही कोणाचंही दास नाही.
आपल्याला हव्या असलेल्या, आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घालतो आणि यालाही समाजात “दास होणं ‘ असंच संबोधलं जातं. बऱ्याचदा स्त्रीला पुरुषाची दास मानलं जातं. परंतु पुराणांपासून आजच्या कलियुगापर्यंत अशी अनेक उदाहरणे देता येतील की पुरुषालाच स्त्रीचा दास मानायला हवं.
विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने मेनकेची नेमणूक केली. भस्मासुराचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूंना मोहिनी होताना स्त्रीरूप धारण करावे लागले आणि अलीकडे तर स्त्रीच्या सौंदर्यावर लुब्ध होताना कोणाचे किती पतन होते याविषयी कल्पना न केलेलीच बरी. राजकीय क्षेत्रात तर त्यावरून निव्वळ घमासान माजले आहे. एक वास्तव मात्र कधीही नाकारता येणार नाही की अधोगती आणि उन्नती असे दोन्ही मार्ग स्त्रीच्या हाती असतात. पौराणिक कथा वाचल्या, इतिहासाची पाने चाळली आणि कलियुगातल्या घटना बघितल्या तर बऱ्याचदा पुरुषच स्त्रीचं दास्यत्व स्वीकारतो हेच वास्तव समोर येईल.
पुरुष स्त्रीचा दास कशामुळे झाला त्याची ही कथा –
परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली. अनेक प्राणी आणि वनस्पती निर्माण केल्या. पृथ्वीवर अनेक सजीव इकडून तिकडे धावू लागले. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. कोकिळेच्या सुरेल स्वरांनी आसमंत मंत्रमुग्ध झाला. सगळ्या प्राणीमात्रांवर सिंहाच साम्राज्य सुरू झालं. पण तरीही आपल्या निर्मितीत काही तरी कमी आहे असं परमेश्वराला जाणवलं.
परमेश्वराला पृथ्वीचं नंदनवन करायचं होतं. आणखी काहीतरी निर्माण करायला हवं असं परमेश्वराला वाटत होतं. पण नेमकं काय ते परमेश्वराच्या लक्षात येत नव्हतं. कोणता सजीव निर्माण करावा हे काही परमेश्वराला कळत नव्हतं. चिंतेत गढलेला देव स्वर्गातल्या तळ्याकाठी काठी फिरत होता. काय करावं सुचत नव्हतं. दमून भागून देवाने तळ्याकाठी असणाऱ्या कदंब वृक्षाखाली बैठक मारली. पाण्यात पाय सोडून बसावं म्हणून देव कदंब वृक्षाखालून उठला. हातभर अंतरावर पाण्यात असलेल्या एका खडकावर बसला. विचारात गढून गेला.
आकाश निरभ्र होतं. तळ्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलं होतं. नभात विहार करणाऱ्या पक्ष्यांचं प्रतिबिंबसुद्धा तळ्यात दिसत होतं. पाण्यातली मासोळी देवाच्या पायाला गुदगुल्या करत होती. देवाला मनस्वी आनंद होत होता. तरीही काहीतरी कमी असल्याची रुखरुख मन पोखरत होती. निसर्गाचं प्रतिबिंब तळ्यात उमटलं होतं. देव ते प्रतिबिंब न्याहाळत होता. तळ्यातल्या पाण्यात उमटलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे देवाचं लक्ष गेलं. देव आपल्या महालात परत आला. सजीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मातीचा गोळा त्यानं हाती घेतला. आधी पुरुषाला आकार दिला. मग स्त्रीलाही घडवलं. दोघांमध्ये प्राण ओतला. दोघांनी परमेश्वराला नमस्कार केला. आपल्या निर्मितीने परमेश्वर समाधान पावला. दोघांनाही खूप काही दिलं होतं परमेश्वरानं. पण लिंगभेद सोडला तर तसे दोघेही दिसायला सारखेच. मानवी आकृत्या. परमेश्वरालाच काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. यातला एक दुसऱ्यावर अधिराज्य गाजवेल असं या दोघांना अजून काहीतरी द्यायला हवं असं परमेश्वराला मनोमन वाटत होतं. पण काय ते मात्र कळेना.
विचार करता करता परमेश्वरानं त्याच्या जवळच्या पोतडीत डोकावलं. आणि हर्षभरानं त्याचे डोळे चमकले. बुद्धी आणि सौंदर्य. त्यानं दोघांना सुखानं नांदण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “मी खूप प्राणी घडवले. पण कुणीच मला नमस्कार केला नाही. तुम्ही मला नमस्कार केला म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुमच्या दोघांच्याही ओंजळीत मी आणखी एकेक दान घालणार आहे.’
“कोणतं देवा?’ दोघेही अधीर झाले होते.
“सांगतो. पण दान मागण्याचा पहिला अधिकार स्त्रीला हे मान्य आहे का तुला.’ परमेश्वर पुरुषाकडे पाहत म्हणाला.
पुरुषाने लगेच आपली संमती दर्शविली आणि परमेश्वराकडे पाहत म्हणाला, “देवाधी देवा, तुमची अट मान्य आहे मला. पण तुम्ही आमच्या ओंजळीत कोणतं दान घालणार आहे ते तरी कळू द्या.’
“हे देवी, सौंदर्य आणि बुद्धी. या पैकी काय हवं तुला. स्त्रीकडे पाहत परमेश्वर म्हणाला.
एका क्षणाचाही विलंब न लावता स्त्री उत्तरली, “मला सौंदर्य हवंय देवा.’
“तथास्तु.’ म्हणत परमेश्वरानं सौंदर्याचं दान स्त्रीच्या ओंजळीत घातलं. त्याबरोबर स्त्री देहाला सौंदर्य प्राप्त झालं. कमनीय बांधा आला. कमल पुष्पाप्रमाणे ओठ लाभले. चाफेकळी नासिका प्राप्त झाली. तिचं सौंदर्य बघून पुरुषाचेच नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराचेही डोळे दिपून गेले.
पण तरीही आधी सौंदर्य मागून स्त्रीनं खुळेपणाच केलाय असं वाटून परमेश्वर मनोमन हसत होता. बुद्धी ही सौंदर्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे याची परमेश्वराला जाणीव होती. परमेश्वरानं उरलेलं बुद्धीच दान पुरुषाच्या ओंजळीत घातलं. दोघे पुन्हा परमेश्वराच्या चरणी लीन झाले. परमेश्वरानं दोघांना पृथ्वीच्या दिशेने मार्गस्थ होण्यास सांगितले.
दोघेही चालून काही पावले पुढे गेले असतील नसतील तोच परमेश्वरानं स्त्रीला हाक मारली. स्त्री जवळ येताच परमेश्वर तिला म्हणाला, “बाळ, एक विचारायचं आहे.’ “देवाधीदेवा विचारा ना, तुम्हाला संकोच मानण्याचं काहीच कारण नाही.’ स्त्री नम्रतेने म्हणाली. खरंतर “सौंदर्यापेक्षा बुद्धी श्रेष्ठ’ असं असतानाही आणि पहिली संधी तुला देलेली असतानाही तू सौंदर्याचं दान का मागितलंस?’
“सौंदर्याच्या बळावर बुद्धीला वश करता येईल देवा.’ असं म्हणत पुरुषाच्या मागोमाग स्त्री पृथ्वीवर आली आणि तेव्हापासून बुद्धी सौंदर्याची दास झाली.
स्त्री प्रसन्न व्हायला हवी. ती प्रसन्न असायला हवी. तरच आपल्या अवतीभोवती सुखाचं नंदनवन निर्माण होईल. कोणाकडे बुद्धी, कोणाकडे सौंदर्य याला तसे व्यक्तिशः काहीही अर्थ नाही. स्त्री देखील बुद्धिमान असतेच. स्त्री आणि पुरुष परस्परपूरक आहेत हे दोघांनी लक्षात घ्यायला हवे. दोघांनी परस्परांचा आदर राखायला हवा. परंतु स्वाभिमान, परस्परांविषयीचा आदर हे दोघांमध्ये अंतर निर्माण होण्याचं कारण असू नये. हे लक्षात ठेवावंच लागेल.
– विजय शेंडगे