नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे आणि लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्यांवरून भाजपनेते आणि खासदार वरुण गांधी आक्रमक झाले आहेत. यावरून त्यांनी स्वपक्षावरच हल्लाबोल केला आहे. त्यामुळे ते पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
वरुण गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यापासून काही काँग्रेसनेत्यांकडून त्याच्या स्वागताचे पोस्टर्स लावण्यात येत आहे. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की, काय अशी स्थिती आहे.
वरुण गांधी यांनी शेतकरी आंदोलन, लखीमपूर खेरीतील हिंसाचाराबद्दल पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. तसेच लखीमपूर हिंसाचाराची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र दिलं आहे. दुसरीकडे त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळण्यात आलं आहे.
दरम्यान या संपूर्ण घटनांनंतर वरुण गांधी यांचे सोनिया गांधी यांच्यासह पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘दु:ख भरे दिन बीते रे भैय्या, अब सुख आयो रे,’ असा मजकूर या पोस्टर्सवर आहे.