पुणे – “करोना’च्या वाढत्या संसर्गामुळे विद्यापीठ व महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या विचारात आहे. त्यावर थेट कुलपती अर्थात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर “राज्यपालांच्या इच्छेनुसार परीक्षेसंदर्भात निर्णय होणार,’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी सांगितले. तथापि, अंतिम वर्षाची परीक्षा होणार की नाही, हा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दि. 19 मे रोजी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. “यूजीसी’कडून काहीच उत्तर न आल्यास राज्य सरकार स्वत:च परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर “यूजीसी’ आणि राज्य सरकारनेही निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत लवकर निर्णय घेण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला शुक्रवारी केली आहे.
या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची शनिवारी भेट घेतली. त्यानंतर “सामंत यांनी तसा निर्णय घेतलेला नाही. राज्यपाल सांगतील, त्याप्रमाणे उच्चशिक्षणमंत्री निर्णय घेतील,’ असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावरून आता परीक्षा होणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
परीक्षा अर्जासाठी विद्यार्थी साशंक
केवळ अंतिम वर्षाची परीक्षा होणार असून, त्यासाठी दि. 19 ते 28 मे यादरम्यान परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या सूचना विद्यापीठाने केली आहे. त्यानुसार विद्यार्थी अर्ज करत आहेत. मात्र, परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ न शकल्याने अर्ज भरायचा की नाही, अभ्यास करायचा, की नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.