पाटणा -बिहारचे आजी-माजी मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार आणि जितनराम मांझी यांच्यात गुरूवारी बैठक झाली. त्या भेटीमुळे बिहारमधील राजकीय समीकरणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा-धर्मनिरपेक्ष (एचएएम) हा पक्ष आठवडाभरापूर्वी विरोधकांच्या महाआघाडीतून बाहेर पडला. त्यापाठोपाठ मांझी यांनी नितीश यांची भेट घेतली. त्यामुळे एचएएम पुन्हा जेडीयू, भाजप आणि लोजपचा समावेश असलेल्या सत्तारूढ एनडीएमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एचएएम हा पक्ष 2015 मधील विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक होता. त्यावेळी नितीश यांचा जेडीयू त्या आघाडीचा घटक नव्हता.
मात्र, जेडीयू जुलै 2017 मध्ये एनडीएत परतल्याने मांझी यांनी त्या आघाडीशी फारकत घेतली. त्यानंतर मांझी राजद, कॉंग्रेसचा आणि इतर लहान पक्षांचा समावेश असलेल्या विरोधकांच्या महाआघाडीत गेले. आता त्यांनी महाआघाडीबरोबरचे संबंधही तोडून टाकले आहेत.
एचएएम पुन्हा एनडीएमध्ये जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, त्याविषयीची भूमिका मांझी 30 ऑगस्टला जाहीर करणार असल्याचे समजते. बिहारमध्ये वेळापत्रकानुसार चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.