नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सनसनाटी मुलाखतीवरून विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपला घेरले. कॉंग्रेसने तर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. मलिक यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तरे हवी आहेत. मोदी मौन व्रत सोडणार का, अशी विचारणा कॉंग्रेसने केली.
कॉंग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला अनेक प्रश्न विचारले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना हवाई मार्गाने का नेण्यात आले नाही? मोदी सरकारने त्यांच्यासाठी विमान उपलब्ध करण्याची परवानगी का दिली नाही? गुप्तचरांनी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची पूर्वसूचना दिली होती. त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले?
दहशतवाद्यांना प्रचंड प्रमाणात आरडीएक्स स्फोटके कशी काय मिळाली? पुलवामा हल्ल्याची चौकशी चार वर्षांनंतर कुठपर्यंत पोहचली आहे? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली का? दहशतवादी हल्ल्यावेळी राज्यपाल असणाऱ्या मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले? हा देशद्रोह नाही तर काय आहे, अशा प्रश्नांचा भडिमार कॉंग्रेस नेत्यांनी केला.