नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हरियाणातील हिंसाचारासाठी सरकारलाच जबाबदार धरले आहे. हा विषय िंहंदुत्वाचा नसून पूर्णपणे प्रशासनाच्या अपयशाचा विषय असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. एका राष्ट्रीय माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयासह अन्य मुद्द्यांवरही आपली परखड भूमिका मांडली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार करू, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रचार करणार नाही. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. याबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेईल आणि संघ आपले निर्णय अगोदर जाहीर करत नसतो. त्यामुळे पुन्हा भाजपची सत्ता आली तर मोदीच पंतप्रधान होतील हे अद्याप ठरले नसल्याची टिप्पणी स्वामी यांनी केली. आपल्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता झालेला असेल असे विधान अलिकडेच पंतप्रधानांनी केले होते. त्याबाबत विचारल्यावर स्वामी म्हणाले की, योग्य धोरणांनुसार योग्य दिशेने जर आपण गेलो तर अमेरिकेनंतर भारत दुसरी आर्थिक सत्ता होऊ शकतो. मात्र पंतप्रधानांच्या विधानातील एका गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे व ती म्हणजे 2024 च्या निवडणुकांनंतर ते पंतप्रधान राहतील की नाही आणि ते अजून ठरलेले नाही असे त्यांनी नमूद केले.
अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण या दोन मुद्द्यांवर सरकारला अपयश आले असल्याचे तुम्ही म्हणता. असे जर असेल तर मोदी यांच्या नावावरच भारतीय जनता पार्टीला 2019 मध्ये दुसऱ्यांदा कसे काय बहुमत मिळाले? असा प्रश्न विचारल्यावर भाजपला हिंदुत्वाच्या नावावर मते मिळाली. भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते हिंदुत्वासाठी समर्पित आहेत. मोदी यांचे हिंदुत्व मात्र रावणासारखे आहे कारण ते त्यांच्या स्वत:साठी आहे अशी धक्कादायक टिप्पणी स्वामी यांनी केली.
दरम्यान, मोदींनी अमेरिकेच्या संसदेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देता परदेशात भारताचा आणि मोदी यांचा दबदबा वाढत चालला असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्वामी म्हणाले की, हे केवळ माध्यमांमध्ये दिसते. वस्तूस्थिती वेगळी आहे. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची संधी इतरही अनेक देशांच्या नेत्यांना मिळाली आहे. भारताकडूनही याबाबत आग्रह करण्यात आला आणि अमेरिकेने तो मान्य केला.