मुंबई : मागच्या काही दिवसांपासून देशासह राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मास्क वापरणे सक्तीचे नसले तरी कोरोना अद्याप पूर्णपणे गेला नसल्याची आठवण करून देत मास्क वापरा काळजी घ्या असे आवाहन केले होते. आता याच बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मास्क सक्ती बाबत जर तरच्या भाषेत उत्तरं दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांमध्ये मास्कसक्तीची चर्चा असताना उपमुख्यमंत्र्यांनी मास्कसक्तीच्या धोरणाबाबत माहिती दिली.
याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉ. व्यास यांच्याकडुन सर्व माहिती मिळते . जगात , देशात , राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये , कोणत्या जिल्यात काय चालले आहे याची माहिती मिळते त्यावरून असे लक्षात येत आहे की कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवर खूप कमी लोक आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.
आमची त्यावर नजर …
कोरोनाच्या बाबतीत अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही तो घेतला पाहिजे बूस्टर डोसही घेतला पाहिजे असे आवाहन केले. शिवाय मास्कच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले , आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क बंधनकारक केला पाहिजे तेव्हा नक्कीच आम्ही मास्क बंधनकारक करू. शिवाय मध्यमप्रतिनिधींशी मिश्कीलपणे बोलताना अजित पवार म्हणाले मास्क बंधनकारक केलाच पाहिजे तुम्हाला कोरोना झाला तर आम्हाला प्रश्न कोण विचारणार ? असेही ते म्हणाले. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टोला लगावत अजित पवार म्हणाले आता पहा काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे.