राज्यासह केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई : झपाट्याने प्रसारित होणाऱ्या संसर्गजन्य करोनावर आळा घालण्यासाठी उपाय योजनांची मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेत उद्या, मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.
आजाराला आळा घालण्यासाठी याचिकाकर्त्याने सुचविलेल्या सुचनांबाबत केंद्र आणि राज्य सरकारला तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तसेच राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहिर केली असली तरी विद्यापीठाच्या तसेच बोर्डाच्या परिक्षा अद्याप सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क पुरवण्याची जबाबदारी कुणाची?, असा सवाल करत मुंबई विद्यापीठाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात शिकराव केलेल्या करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत ठोस उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. त्याचबरोबर राज्यभरातील न्यायालये, लवाद, प्राधिकरण या ठिकाणी सुरू अत्यावश्यक खटले वगळता इतर खटलेही तूर्तास स्थगित करावेत.
जेणेकरून लोकांचा वावर कमी होईल, अशी मागणी डोंबिवलीच्या विधी महाविद्यालयाचे संचालक सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. या याचिकेची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी याचिकाकर्त्यांने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अन्य सुचना सुचविल्या आहेत. याची दखल घेऊन न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला भूमीका स्पष्ट केरण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी उद्या निश्चित केली.