पाटणा – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणीही असला तरी तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगला असेल. तो खरा, इमानदार आणि देशाप्रती निष्ठा असणारा असेल. त्यामुळे आमच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी चिंता करू नये अशी प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली.
पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारच्या गॅस सिलिंडराच्या दरात 200 रूपये कपात करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता हा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. मी तुमच्या खिशातून पाच हजार रूपये काढून घेतले आणि तुम्हाला 200 रूपये परत केले तर तुमचा फायदा झाला की तोटा? हा केवळ निवडणुकीसाठीचा स्टंट आहे आणि देशातील नागरिकांना हे सत्य माहिती आहे.
दंगे घडवून आणणारा पक्ष आणि संविधान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पक्षाला जनता चोख प्रत्युत्तर देईल असा दावा करतानाच जनतेच्या आवाहनावरूनच आम्ही सगळे विरोधी पक्ष या आघाडीत एकत्र आलो आहोत असे ते म्हणाले.
एका सामायिक कार्यक्रम घेऊन आम्ही उभे आहोत आणि विजय आमचाच होईल असा आम्हाला विश्वास आहे. लालू प्रसाद यादव आणि नितीश यांनी ठरवलेच होते की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करायचे. तसे ते झाले असून आता भारतीय जनता पार्टी घाबरली आहे असे तेजस्वी म्हणाले.