सिंहगडरस्ता, दि. 12 (प्रतिनिधी) -वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम मुख्य कंत्राटदार संस्थेद्वारे चालविले जाते. परंतु, कंत्राटदार किंवा त्यांचा प्रतिनिधी प्रकल्पावर हजर नसतो. तर, महापालिका प्रशासन म्हणते की, आम्ही दुसरा कंत्राटदार नेमलेला नाही. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी हे तिसऱ्याच संस्थेकडून दिले जात असल्याने महापालिकेचा वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प नेमके कोण चालवित आहे? असा प्रश्न उपस्थित करीत पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिला आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत चरवड यांनी सांगितले की, हा प्रकल्प एक खासगी संस्थेकडून चालविला जात आहे. परंतु, या प्रकल्पामध्ये त्रुटी, दोष आणि अनियमितता आहे. पाणी शुद्ध करताना सर्व युनिटचा वापर केला जात नाही, यामधील काही युनिट देखभाल, दुरुस्ती अभावी बंद आहेत. अनेक वर्षांपासून व्हॉल्वची सफाई करण्यात आलेली नाही. लॅमेला युनिटची बेरिंग नादुरुस्त झाल्यामुळे ते बंद आहे. वाळूचे बेड बऱ्याच वर्षांपासून बदललेले नाहीत. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालविला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत आयुक्तांना माहिती दिली आहे. याशिवाय पर्वती जलशुद्धीकरण आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणेमध्येही त्रुटी आहेत. अकुशल कर्मचारी आणि कमी मनुष्यबळामुळे या प्रकल्पाची अवस्था गोंधळाची असल्याचेही चरवड यांनी म्हटले आहे.
आमच्या माहितीप्रमाणे प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे. पाणी शुद्ध करूनच नागरिकांना दिले जाते, यासाठी आम्ही आणि आमचे अधिकारी प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहोत. नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आमचीच आहे. तरीही त्यात काही त्रुटी असतील तर त्याची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना तातडीने करू. – संजय देशमुख, कार्यकारी अभियंता, जलशुद्धीकरण प्रकल्प
जल शुद्धीकरण प्रकल्पामधून शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही, जर, तशा, अनियमितता प्रकल्पामध्ये असेल तर संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. – विद्या घटवाई, सामाजिक कार्यकर्त्या
कर्मचारी संख्येत तफावत…
या प्रकल्पाच्या निविदेनुसार येथे 79 कर्मचारी असणे अपेक्षित आहे. परंतु, सप्टेंबर 2021मध्ये 92 कर्मचारी हजर होते. ऑक्टोबर 2021 मध्ये 66, नोव्हेंबर2021मध्ये 73, डिसेंबर 2021 मध्ये 75 कर्मचारी हजर होते. या तफावतीबाबत प्रशासनाला विचारले असता माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले. तर, दोन-दोन महिने आम्हाला वेतन वेळेवर मिळत नाही, बोनसही नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.